पसारा करणारे आणि आवरणारे !

जगताना ईतरांच्या सहकार्यानं/मदतीनं पुढं जाणं (Delegate) हा विषय Urgent But Not Important कामं शिकवताना येतो. प्रत्येक घरात घरभर पसरलेला पसारा आवरत बसणारी एखादी व्यक्ती असते, (स्त्री पुरुष कुणीही) हिला सगळं जागच्या जागी आवडत असतं, टापटिप रहाण्याची सवय असते, मुळात ही व्यक्ती सुव्यवस्थित रहाण्याप्रति संवेदनशील असते, संवेदनशील म्हणजे वस्तूंचे ट्रिगर्स कॅच करणारी. वस्तू विचार आणि भावना ट्रिगर करतात, चहाचा कप, फूटबाॅल, क्रिकेटची बॅट …एक एक वस्तू विचारांची मालिका देतात. Minimalism जीवनशैलीत हेच ट्रिगर्स कमी करुन शांत क्रिएटिव वातावरण तयार केलं जातं.

हा जागृती आणि विकसित मनाच्या संवेदनशीलतेचा प्रश्न असतो तो त्यांचा प्राॅब्लेम असतो कारण बाकीच्यांना काहीच वाटत नसतं, भावनांवर आणि संवादावर(कम्युनिकेशन)काम करुन यावर उपाय मिळवता येतो. आजूबाजूची माणसं ब-याचदा तंद्रीतच जगत असतात ते असून नसतात, हरवलेले असतात, आजकाल तर फोन एक मोठ्ठं कारण आहे, त्यामुळे पसारा हा विषय एखाद्याच्या लक्षातही येत नाही असं असू शकतं. शिवाय सवयी वर्तन नियंत्रित करतात.

उपाय

1) भावनांची जवाबदारी घ्या

  • आपल्याला जे दिसतंय आणि त्यामुळे जे वाटतंय (feelings) त्याची जवाबदारी आपली आहे हे आधी स्विकारा. राग येणं, चिडचीड, बडबड …
  • घरभर वस्तू पसरुन ठेवता मी एकटीनंच/एकट्यानंच करायचं का !
  • साध्या चपला काढल्यावर कपाटात ठेवता येत नाही का!
  • ग्लास विसळून का नाही ठेवला!
  • सकाळपासून कप तिथेच पडून आहे!
  • चादरीची घडी सुध्दा केलेली नाही!
  • राहू दे की तुला कोणी सांगितलंय!
  • काय कटकट आहे !
  • शिस्तीचा वैताग आलाय!
  • मनासारखं जगता येत नाही!
  • अशा तक्रारी आणि वादानं मूळ विषय तसाच रहातो, ही मालिका सुरुच रहाते.
  • हा त्रागा आणि मनस्ताप काहीच बदल करु शकत नाही कारण या हल्ल्यामुळे समोरचा बचावाची भूमिका घेतो आणि उलट स्वतःचं समर्थन करायला लागतो.
  • राग, चिडचीड आणि नैराश्य या प्रतिक्रिया माझ्या आहेत, कुणीही मी परवानगी देत नाही तोवर माझ्या भावना दुखावू शकत नाही कारण माझे विचार भावना निर्माण करतात आणि माझ्या विचारांवर मी काम करु शकतो/शकते.काय बोलायचं? कशी प्रतिक्रिया द्यायची याचे निर्णय माझ्या हातात आहेत.भावनांवर मी नियंत्रण ठेवू शकते/शकतो.
  • मला माझ्या भावनांवर काम करायचंय, समोरचा मला दुखावण्यासाठी कृती करत नाही.मला व्यक्तीचा नाही तर विशिष्ट वर्तनाचा राग आलाय आणि तेच पोहोचवायचं आहे ही स्पष्टता हवी.

2) संवादकौशल्य वाढवा

शब्दांवर आणि बोलण्यावर काम करायचं आहे. अहंकारावर हल्ला आणि टीका करुन, शिक्षा देऊन विरोध निर्माण होतो बदल नाही. बदलासाठी आपली बाजू समोरच्यानं समजून घेणं गरजेचं असतं आणि त्यासाठी ती नीट पोहोचणं महत्वाचं असतं.

आपल्याला काय हवंय? समोरच्याला काय कळायला हवंय? तर आपल्या भावना ! कोणत्या? तर ईतरांची वैयक्तिक कामं करताना येणारा #थकवा, वेळ वाया जाण्याचं #नैराश्य घराची व्यवस्था बिघडल्यानं निर्माण होणारा #ताण…आई असेल तर संस्कार देण्यात कमी पडण्याचं #प्रेशर

थोडक्यात आपल्या भावना समोर पोहोचल्या पाहिजेत हे आपलं ध्येय आहे. उदा. तुला साधं कळत नाही चपला काढल्यावर कपाटात ठेवायच्या …तू अमुक सुध्दा असंच करतेस…परवा हेच… यानं काहीच साध्य होत नाही. यापेक्षा बदलाची थोडीतरी शक्यता/आशा देणारा दुसरा मार्ग पाहू.

3) भावना व्यक्त करणं

वस्तू ईकडेतिकडे फेकलेल्या दिसल्या की मला आवराव्या लागतात, आपण हेच करण्यात आयुष्य वाया घालवतोय याचं दु:ख होतं, स्वतःसाठी काहीच करायला वेळ मिळत नाही याचं वाईट वाटतं. (भावनांची जवाबदारी घेत स्वतःच्या भावना पोहोचवणं, बाजू सांगणं) तू या वस्तू दरवेळी जाग्यावर ठेवल्यास तर आपलं घर व्यवस्थित दिसेल, एनर्जी छान राहील असं मला वाटतं, मदतीनं माझं काम कमी होईल, आराम मिळेल, छान वाटेल. बघ जमलं तर. (अपेक्षा आग्रह न करता मांडणं, स्वातंत्र्य देणं.)

आता भावना पोहोचल्या पण समोरच्याच्या अहंकाराला वावच दिलेला नाही, तो बोलणार काय? त्याला आपणच बाजूला केलं, मधे येऊ दिलं नाही. ईथे लगेच नाही पण बदलाची शक्यता आहे, आपण ईतरांचं वर्तन नियंत्रित करु शकत नाही पण प्रभाव निर्माण करु शकतो influence करु शकतो, यापेक्षा जास्त अपेक्षा आणि हट्ट करण्यात वेळ आणि ऊर्जा वाया जाते. काय करायचं नाही यापेक्षा काय करायचं हे सांगायचं, उपाय द्यायचे.

उदा. खेळणी ईकडे तिकडे फेकू नको यापेक्षा खेळणी या बास्केटमधे ठेवत जा हे बोलणं ट्रेनिंग होईल. यानंतरही *परिस्थिती, माणसं बदलत नसतील तर आपण आपल्या संवादकौशल्याचा अभ्यास वाढवायची, नव्यानं शिकायची गरज आहे ईतकंच समजून घ्यायचं आणि स्वतःला बदलायचं.*

(नाही पण …/ तरी पण… तो असा…, ती अशी… अशा कमेंटसला उत्तर देऊ शकत नाही, अजूनही ईतरांबद्दल तक्रारी असतील तर पोस्ट सोडून द्या. दुस-याला सुधारणं, धडा शिकवणं, अद्दल घडवून सरळ करणं यात वेळ आणि ऊर्जा वाया जाते असं मला वाटतं, स्वतःला बदलून परिस्थितीत बदल करण्याची सुरुवात करायची असेल तर या पोस्टचा उपयोग होईल.)

© कांचन दीक्षित